जिवन प्रवास

००० जिवण प्रवास  ०००

संध्याकाळचे साडेपाच वाजले असतील , थंडीचे दिवस असल्याने वार्‍यातून थंडी बोचत होती. सूर्य मावळतीला लागल्याने आभाळ संध्याकाळची चाहुल लागुन चहुकडे रंग उधळित होता. मी नेहमीच्या वाटेने शाळेतून घरी जायला परतीच्या मार्गाला लागलो होतो. रस्त्यात भेटणार्‍या ओळखीच्या व्यक्तींना , झाडांना , पानाफुलांना हात दाखवत , दिवसभर मुलांच्यात राहुन एक अलौकिक समाधान घेवून मी आपल्याच नादात चाललो होतो. रस्त्यात मध्येच लागलेल्या गावात रस्त्यावर आडव्या येणार्‍या कोंबड्यांना चुकवत मी रस्ता कापत होतो. एवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने गाडीवरून येण्यासाठी हात दाखवला. मी स्वभावाप्रमाणे गाडी थांबवली. या रस्त्यावर बस किंवा वडापची सोय नसल्याने कुणाही गाडीवानाला हात दाखवत गाडी थांबवून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याने जाताना मला कुणी हात दाखवला तर मी गाडी थांबवतो. ते गृहस्थ गाडीवर बसले आणि आमचा दोघांचा प्रवास सुरू झाला.

पन्नाशी पार केलेली , दाढी वाढलेली व्यक्ती अनोळखी असल्याने मी काहीच बोललो नाही. प्रवास सुरू होताच ते गृहस्थ माझ्याकडे बघत म्हणाले ,

" तुमी सर हायसा ? "

मी , " होय."

" सर , माझी बायको मेलिया. तेची नोंद ग्रामसेवकापासी कराय पायजे ? "

ते गृहस्थ मला आशाळभूत नजरेने विचारू लागले. आतापर्यंत मी माझ्याच विश्वात मग्न होतो. माझ्या गाडीवर बसलेल्या व्यक्तिशी फक्त बसा एवढेच बोललो होतो. परंतु त्या गृहस्थाच्या प्रश्नाने मी खाडकण जागा झालो. कुणीतरी आपल्याला अनोळखी असूनही योग्य माहिती मिळेल या आशेने आपली व्यथा सांगताना बघुन मलाही रहावले नाही.

" मामा , तुमची बायको कधी मरण पावली ? " मी म्हणालो.

" ती मेलिया बगा , दसर्‍याच्या तिसर्‍या माळलां. "

गृहस्त सांगत होते.

त्यांच्या या बोलण्याने मला तारखेचा कोणताच अंदाज न आल्याने , मी त्यांना परत विचारलं ,

" मामा , तारीख लिहुन ठेवली असणारकी ? "

" तारीक हाय बगा फोटोवर लिवली."  ते म्हणाले.

" मामा , तुमच्या बायकोच्या मृत्यूची नोंद ग्रामसेवकांकडे लवकर करून मृत्यू दाखला घ्या. घर , शेती , रेशन इत्यादि साठी ते उपयोगी पडतं. " मी म्हणालो.

मी सांगितलेल्या माहितीने त्यांचे समाधान झाल्याचे मला त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते. बायको गेल्याचे दु:ख त्यांच्या बोलण्यातून सारखं जाणवत होतं.

म्हातारपणी नवर्‍याला बायकोचा आणि बायकोला नवर्‍याचा मोठा आधार असतो. बालपण , तरूणपण आणि प्रौढपण लवकर निघुन जातं पण म्हातारपण मात्र सरता सरत नाही. म्हातारपणी पोटची पोरही म्हातार्‍या आईबापाचं करत नाहीत. अशावेळी दोघांचीच एकमेकांना साथ असते. या मामांची स्वत:ची पोटची पोरं नसल्याने त्यांना एकांगी जिवन जगावं लागत होतं. त्यांनी दुसर्‍या लग्नाचा विचारही केला होता. पण म्हातार्‍या माणसाशी लग्नाला तयार होणार्‍या मुली ,

" जमीन नावावर करणार काय ? "  असं विचारतात.

समजा जमिन नावावर केली. तरी ती स्री म्हातार्‍यासोबत शेवटपर्यंत संसार करेलच याची शास्वती नाही. त्यामुळे त्या मामाने दुसर्‍या लग्नाचा विचार सोडुन एकटेच एकांगी जिवन जगायचे ठरवले.

पोट भरेल एवढं रोज शिजवायचं आणि कसंबसं खावून आपल्या शेतात राबायचं. हाच त्यांचा दिनक्रम सुरू होता. कधी शेतीची कामं करून कंटाळा आला तर अंगाचं दुखणं घालवायला आणि मनातले दु:ख काही काळापुरते का असेनात विसरायला ते मद्याचा सहारा घ्यायचे.

शेवटी - माणूस जन्माला आला तो एकटाच आणि जाणारही एकटाच. ही जिवनवाट एकट्यानेच चालायची आहे. नाती गोती ही काही काळापूरती साथ देणार . शेवटचा प्रवास हा एकट्याचाच ! हेच जिवनाचे अंतिम सत्य आहे............... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा